*डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे सर्वेक्षण वेगाने सुरू;*
*पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती*

अनिरुद्ध मिश्रा /नवी दिल्ली: लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी डहाणू-नाशिक रेल्वे लाईनबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, या मार्गाचे सर्वेक्षण अतिशय वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी यावेळी बोलताना कल्याण-मुरबाड या शहरी भागातील रेल्वे लाईनचे काम सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. यासोबतच, बहुतांश आदिवासी आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या ‘डहाणू-नाशिक रेल्वे लाईन’चे सर्वेक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण कधी पूर्ण होणार आणि या प्रकल्पाला मंजुरी कधी मिळणार, असा महत्त्वपूर्ण प्रश्न डॉ. सवरा यांनी संसदेत विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, डहाणू ते नाशिक या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा मार्ग पश्चिम घाटातून (Western Ghats) जात असल्याने हा एक अतिशय गुंतागुंतीचा (Complex) प्रकल्प आहे. पश्चिम घाटाची भौगोलिक परिस्थिती आणि त्यातील आव्हाने लक्षात घेता या प्रकल्पात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी सभागृहाला दिले.
या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

