वेवूर येथील महार वतन जमिनीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप; गायकवाड कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत

Oplus_16908288
पालघर दि १५:-
पालघर जिल्ह्यातील वेवूर गावातील महार वतन जमिनींच्या कथित बेकायदेशीर विक्रीप्रकरणी आता सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात दलित चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अँड. अजिंक्य वि. म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित बाजू मांडली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अँड. अजिंक्य म्हस्के यांनी दावा केला की, संबंधित महार वतन जमीन शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय विकण्यात आली असून हा व्यवहार कायद्याच्या विरोधात आहे.
तसेच या प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्यांचा वापर झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.
त्यांनी सांगितले की, बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन्स अबोलिशन ॲक्ट १९५८ च्या कलम ५(३) आणि ७ नुसार शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय वतन जमीन विक्री करता येत नाही.
म्हणूनच संबंधित जमीन व्यवहार रद्द करून जमीन पुन्हा मूळ महार वतनदारांच्या वारसांच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अँड. म्हस्के यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर दलित समाजाच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल.
दरम्यान, या प्रकरणामुळे पालघर जिल्ह्यात महार वतन जमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


