सातिवली उड्डाणपुलावरील पथदिवे बंद अंधारामुळे अपघातांचा धोका वाढला

वार्ताहर – अनिल साळुंखे
मनोर,25/04/26
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील पथदिवे अद्यापही बंद अवस्थेत असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. दृश्यमानता कमी झाल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातिवली उड्डाणपुलाच्या काही अंतरावर वरई गावाच्या हद्दीत मुंबई वाहिनीवरील वांद्री नदीवरील पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उतारावर वाहतूक नियमन करण्यात येत असून, त्याच ठिकाणी अंधार असल्यामुळे अपघातांना जणू आमंत्रणच मिळत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील व्हाईट टॅपिंग कामादरम्यान सातिवली, जव्हार फाटा, नांदगाव फाटा आणि अच्छाड फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात आले. सातिवली येथील उड्डाणपुलाचे बांधकाम तब्बल वर्षभर लांबले होते. अखेर डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहतूक सुरू झाल्यानंतरही पथदिव्यांची योग्यरीत्या जोडणी करण्यात आलेली नाही.
गेल्या पाच महिन्यांपासून उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करण्याकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, उड्डाणपुलावर तसेच पुलाखालील परिसरात अंधार पडत असून ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय होत आहे.
अपघातात वाढ
रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना मार्ग नीट दिसत नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावरील बंद पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
अनेक वर्षापासून पद दिवे बंद
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अनेक उड्डाणपूलांवरील पथदिवे गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. तरीही संबंधित महामार्ग प्राधिकरणाकडून त्यांची दुरुस्ती व सुरूवात करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

